Monday, January 11, 2016

खोडदला पुष्परंगांची मुक्तहस्ते उधळण!

खोडदला पुष्परंगांची मुक्तहस्ते उधळण!
किल्ले नारायणगड : नैसर्गिक सौंदर्याचा अनोखा नजराणा
क्लोरोफायटम भारुचे कुली ही वनस्पती कशी ओळखावी तर साधारणपणे जूनमध्ये पहिल्या पावसावर ही वनस्पती उगवून येते, जमिनीपासूनची उंची साधारणपणे दोन ते तीन फूट असते. बागेतील लिलीप्रमाणे पाने जमिनीतून वर येतात. याच पानांच्या गुच्छातून फुलांची दांडी निघते आणि त्यावर जुलै-ऑगस्ट महिन्यात फुले लागतात.
■ एका झाडाला साधारणपणे २0-३0 फुले लागतात. फुलांचा रंग पांढरा आणि फुले शक्यतो जमिनीकडे झुकलेली असतात. प्रत्येक फुलाला सहा पाकळ्या आणि प्रत्येक पाकळीच्या टोकावर खाकी किंवा चॉकलेटी रेष असते. जमिनीमधे याला कंद येतात. हे कंद औषधी असतात. अशोक खरात ■ खोडद
हिरवा शालू परिधान केलेल्या निसर्गात आता विविध रंगांची मुक्तहस्ते उधळण होताना दिसू लागली आहे. नैसर्गिक सौंदर्याचा अनोखा नजराणा किल्ले नारायणगड मात्र सध्या विविध रंगांच्या वेगवेगळ्या फुलांनी बहरून गेल्याने निसर्गाची नवलाई दिसून येत आहे. ही सप्तरंगी पुष्पदुलई पाहण्यासाठी पर्यटक व अभ्यासक नारायणगडाकडे आकर्षित होऊ लागले आहेत.
जुन्नर तालुक्यातील नारायणगड किल्ल्यावर सध्या 'दुर्गप्रेमी-निसर्गमित्र' या व्हॉट्स अँप ग्रुपने शिवाजी ट्रेल या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली दुर्गसंवर्धनाचे काम सुरू केले आहे. याच कार्याचा एक भाग म्हणून वृक्षवल्ली सुभा या विभागामार्फत किल्ल्यावरील दुर्मिळ आणि किल्ल्यांवरील वनस्पतींची माहिती संकलनाचे कामही सुरू करण्यात आले आहे.
खोडदचे सुपुत्र वनस्पती अभ्यासक तसेच नारायणगड वृक्षवल्ली सुभाचे उपाध्यक्ष राजकुमार डोंगरे हे नारायणगडावरील पुष्पवनस्पती, औषधी वनस्पती व दुर्मिळ वनस्पतींची माहिती संकलित करण्याचे काम करत आहेत.
किल्ले नारायणगडावरील जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांत किल्ल्यावर आढळणार्या वनस्पतींचे छायाचित्रण करण्यात आले. यामध्ये भुईचक्र, वर्षाराणी, नभाळी, गवती तिळवण, छोटा कल्पा, झिनिया, सांगखी, खटखट, बंबाखू, काळमाशी, लहान जास्वंद, पिवळा आग्या, पांढरा आग्या, रानजाई, बानवेल, रुलिया, सिसवंड, पिवळी तिळवण, पाषाणभेदी, पानकुसुम, जांभळी पुनर्णवा इत्यादी पावसाळी रानफुले आढळली आहेत.
यामध्ये सह्याद्रीतील क्लोरोफायटम भारूचे नावाची दुर्मिळ वनस्पती नोंदवली गेली आहे. याच कुळातील कुली नावाचे रानफूलदेखील नारायणगडावर पाहायला मिळाले.
क्लोरोफायटम भारूचे वनस्पती ही सध्या सह्याद्रीमध्ये नामशेष होण्याच्या मार्गाने वाटचाल करत आहे. आपल्या सर्वांनाच या वनस्पतीच्या संवर्धनासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.



दीपोत्सव किल्ले संवर्धक " शिवाजी ट्रेलचा"

दीपोत्सव किल्ले संवर्धक " शिवाजी ट्रेलचा"
आपल्या आठवड्यातील सुट्टीचा भेटणाऱ्या आरामाचा दिवस म्हटल कि तो म्हणजे रविवार. या वाराला अनेक घामाचे दवबिंदू चिटकविण्याचे काम गेली 20 वर्षे किल्ले संवर्धक "शिवाजी ट्रेल " करत आहे. या संवर्धन कार्यात अनेक चमत्कार घडलेले मला आपणास प्रकर्षाने सांगावेसे वाटतात. कारण ते आपल्याच शरीराशी निगडीत आहेत. किल्ले संवर्धन कार्य करत असताना गळणार्या घामाच्या धारांनी बर्याच मावळ्यांचे शुगर सारखे आजार बरे झालेत, ज्यांना डोळ्यांवर चश्मा लागला होता आता ते बिनधास्त चश्मा न वापरता किल्यांवर फिरतात, ज्यांना लिगामेंटचा त्रास होत होता ते आज पळू लागलेत तेही कुठलाही त्रास न होता. असे अनेक प्रकार आहेत. मग हा चमत्कार नाही का?
या पाठीमागचे कारण असे असु शकते कि गड किल्यावर असणार्या टाक्यांमध्ये आलेले औषधी पाणी. कारण अनेक औषधी वनस्पतींवर पावसाचे पाणी पडून ते जमीनीत जिरून या टाक्यांमध्ये साचले जाते. मी अनुभवले आहे कि या पिण्याच्या पाण्यापासून खोकला, सर्दी, ताप बरा होताना.
या पाठीमागचे दुसरे कारण येथे मिळणारा शुद्ध ऑक्सीजन, शुद्ध हवा, शरीराला थंडक देणारे वातावरण, संपूर्ण प्रदुषणांपासून दुर व शांतता प्रस्थापित करणारे हे ठिकाण. डोळ्यांना गारवा व सुख देणारी दृष्य याच ठिकाणापाशी आपणास मिळतात. म्हणूनच मित्रांनो या गड किल्यांच्या प्रेमात पडा व आपले जीवनमान वाढवण्याची जबाबदारी स्वतःच घ्या. आम्ही "शिवाजी ट्रेल " ने हेरले आहे, प्रत्यक्ष अनुभव घेतले आहेत म्हणुनच या संवर्धनाचे वेड लावुन घेतले आहे. त्यामुळे आमचा उपक्रम या विशाल सह्याद्रीच्या जटांवर आम्ही राबवत आहे. या जटांची निगा राखणे कर्तव्य समजुन गड किल्ले यांचेच फक्त संवर्धन करत नसून येथील परीसरातील अनेक गरीब व्यक्तींची वैद्यकीय सेवा, मुलांसाठी लायब्ररी, व अनेक उपक्रम कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत न घेता करत आहोत. आपणही यात सिंहाचा वाटा उचलात तर निश्चितच आपल्या हातून एक शुभकार्याचा उदय होईल.
या सर्व गोष्टींचा बारकाईने अभ्यास केला तो आमचे ट्रेल चे गुरू श्री . मिलिंदजी क्षीरसागर यांनी व त्यांच्या प्रयत्नशील वृत्तीस फळ लाभले व त्यांच्या अथक प्रयत्नाने आज महाराष्ट्रातील अनेक गड किल्ले सुखावत आहेत. गेल्या वर्षी महाराष्ट्र राज्यातील 81 किल्यावर दुर्गपुजा एकाच दिवशी आयोजित करण्यात आल्या होत्या. व या वर्षी प्रथमच सहा किल्यांवर दीपोत्सव साजरा करण्यात आला. यातील तीन किल्ले जुन्नर तालुक्यातील किल्ले शिवनेरी, किल्ले चावंड व किल्ले नारायणगड यांचा समावेश होता. दीपोत्सव रोषणाईत उजळून निघालेले हे किल्ले रोषणाई मुळे त्यांचे अस्तित्व व वैभव त्यांना पुन्हा प्राप्त झाले होते कि काय असे वाटत होते. त्यांची सुंदरता अप्सरेला लाजवेल अशी दिसत होती. अशा या आनंदमय परीसरात बागडताना मानसिक आनंदाला खरोखरच सीमा नव्हती. मग देताय ना साथ या रानवेड्यांना? या आनंदात आपणही सहभागी व्हावे हीच सदिच्छा.
खास - आपला आवाज व आयवन न्युज या दोन्ही ही टिव्ही चायनल यांनी दिलेली साथ खरोखरच लाख मोलाची आहे त्यामुळे त्याचा येथे मी निसर्ग रम्य जुन्नर तालुका पेज परीवाराकडू धन्यवाद व्यक्त करतो.
श्री.खरमाळे रमेश
( माजी सैनिक खोडद )
निसर्ग रम्य जुन्नर तालुका




रिमझिम नारायणगड.

 नेहमीच ऑफिसातील कटकटीला वैतागलेला कोणताही मनुष्य मनातील व डोक्यावरचा तान कमी करण्यासाठी एका निवांत पण पावसाळ्यातील निसर्गाच्या सानिध्यातील अतिरम्य परिसराच्या शोधात असतो नाही का? आपणास कबुल करावेच लागेल कि कोणतीही सुंदर दिसणारी गोष्ट क्षणभरका होईना शरीराचा थकवा दुर करते. मग दरवर्षी लाखो मुंबईकर पावसाळ्यात जवळच असलेल्या माळशेज घाटाकडे धाव का घेतात सांगाल का? जे सुख समाधान घरात ,ऑफिसात बसून मिळत नाही त्याच्या कितीतरी पट सुख समाधान निसर्गाच्या सानिध्यात घालवलेल्या एकाच दिवसात कसकाय बर मिळत? म्हणून सांगावेसे वाटते की सुख समाधानाची देवता म्हणजेच निसर्गच. साधु संतांनी जे कमवल ते एकांतातील निसर्गाच्या सानिध्यातच.आणि तेही डोंगर दर्या पायाखाली तुडवूनच. पुर्वी मंदिरांची रचना पाहुन याची प्रचीती येते. जे मंदिर बनविले जायची ती डोंगर माथ्यावर किंवा गावापासून अगदी दुर याला कारणही तसेच होते कि मनुष्याने सकाळी लवकर उठून देवपुजेसाठी तेथे अनवाणी चालत पोहचावे व जाताना ताजा ऑक्सीजन व अनवाणी पायाने होनार रक्ताभिसरन कि ज्यायोगे मनुष्य तंदुरुस्त रहावा. आज प्रत्येक गावातच शेकडो मंदिर घरालगतच पहावयास मिळतात. जेव्हा झोपेतून उठुन आळस द्यायला दरवाजात आल कि देवदर्शन तेव्हाच होत मंदिरात जाण्यासाठी तकलीफ घेण्याची गरजच पडत नाही. सुख समाधान विकत जरी मिळत नसले तरी ते फुकट मिळविण्यासाठी प्रत्येकास स्वत: कष्ट घ्यावे लागतात. हा मामला अहस्तांतरणीय आहे नाही का? याच सुखाच्या शोधाच्या वाटेला रविवारी निघालो होतो. धेय होत नारायणगड संवर्धन. येथे या कार्यसाठी "शिवाजी ट्रेल "चे रात्री 2:30 वाजता पुण्यातुन 15 तरुण येऊन पोहोचले होते व एक ग्रुप तीन दिवस आधीच येऊन त्यांचे कार्य चालूच होते. मी सकाळी नारायणगडावर लवकरच पोहचल्याने गडावर आम्ही दोघेच होतो सोबतीला गड आणि मी. भटकंतीला सुरूवात केली रिमझिम पावसातच, शरीराला व मनाला भुरळ घालत होते गडावर उसळणार्या धुक्याच्या लाटा व या लाटा मोरांच्या ओरडणार्या आवाजावर आपले नृत्य वलयांकित रुप धारण होताना पाहण्याचा आनंद मोबाईलच्या क्लिक वर मी छायाचित्रद्वारे टिपत टिपत आनंद घेत होतो. मध्येच गाडीच्या वाजलेल्या हाॅर्नने लक्ष वेधले गेले व संवर्धन करण्यासाठी गडाकडे झेप घेताना किल्ले संवर्धक शिवाजी ट्रेलचे मावळे दृष्टीस पडले.मी प्रवासास ब्रेक देऊन संवर्धन कार्यास परतीच्या मार्गी लागलो. तेथेल निसर्ग अनुभवला तिच ही छायाचित्रे. 
छायाचित्र - श्री.खरमाळे रमेश
( माजी सैनिक खोडद )





Thursday, January 7, 2016

हजारो पर्यटकांचे आकर्षण -श्री.रमेश खरमाळे

नारायणगड (जुन्नर तालुका )
जुन्नर तालुक्यातील मध्यवर्ती व सर्वात मोठे शहर म्हणजे नारायणगाव या शहराचे हे नाव पडले ते ऐतिहासिक गड अर्थात नारायणगडाच्या प्रतिमेतुन गावाला वैभव खुप लाभलय परंतु येथे प्रसिद्धीच्या माध्यमातून गड हरल्या प्रमाणे वाटतोय.
मित्रांनो जुन्नरकर असल्याचा अभिमान वाटावा म्हणून आपल्या गडाचा इतिहास शेअर करून अनेकांपर्यत पोहचविण्याचा प्रयत्न कराल अशी आशा व्यक्त करतो.
छायाचित्र - श्री.खरमाळे रमेश
( माजी सैनिक खोडद )
निसर्ग रम्य जुन्नर तालुका "



नारायणगडा वरील विविध उपक्रम











नारायणगड बद्दल थोडेसे

खोडद गावाच्या उत्तरेला " नारायणगड " आहे. त्याच्या कुशीत गडाचीवाडी नावाची वस्ती वसलेली आहे. नारायणगड हा किल्ला किल्ल्यां च्या तीनप्रकारापैकी गिरिदुर्ग या प्रकारा मध्ये समाविष्ट होतो. पुणे जिल्ह्या मध्ये पुणे – नाशिक महामार्ग वर पुणे शहरा पासून ९० कि.मी अंतरा वरील नारायणगाव या गावा पासून पूर्वेस १० कि.मी अंतरवर माळवाडी (खोडद) तेथून उत्तरेस साधारण४ कि.मी नारायणगड आहे हा किल्ला समुद्र सपाटीपासून ८७६ मीटर उंचीवर आहे. नारायणगाव ते खोडद अत्यंत निसर्गरम्य परिसर आहे. मुळात 'नारायणगड ' हा किल्ला दूरवरून ओळखला जातो तो त्याच्या दोन शिखरांमुळेच नारायणगडाच्या कुशीतील वसलेली गडाचीवाडी बहुदा या वस्तीचे नाव गडा शेजारी वसलेली आहे म्हणून पडलेले असावे. तेथून गडावर जायला रस्ता आहे. नारायणगडाच्या पायथ्याला मुकाईमातेचे सुंदर मंदिर आहे तेथे पाण्याची मोठी टाकी देखील बसवलेली आहे. दुरवर दिसणारा शिवनेरी आणि त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या अंबा अंबालिका लेण्यांचा डोंगर मुळातच जुन्नर या शहराचा चा इतिहास अत्यंत
प्राचीन त्याच्या शेजारी असलेला नारायणगड हा किल्ला मध्ययुगातील आहे असे अनुमान आपण लावू शकतो. 'मुकाई ' मंदिराच्या मागून गडावर जायला सुंदर पायवाट आहे. अलीकडील काळात तेथे नवीन दगडी पायऱ्या बसविण्यात आल्या आहे. नारायणगडावर जाताना जास्त झाडी आजिबात नसल्याने गड थोडासा उजाड असल्यासारखा वाटतो. किल्याच्या पायवाटेवर बोरीची झाडे आणि बाभळीची झाडे आपल्या स्वागताला तयार असतातच. यावाटेवरून थोडे पुढे गेले असता आपल्याला काळात खोदून काढलेल्या पायऱ्या दिसतात. यापायऱ्या आजही चांगल्या स्थितीमध्ये असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि तेथे काही नवीन दगडी सिमेंट मध्ये बांधकाम केलेल्या पायऱ्या आहे. या काळात खोदलेल्या पायऱ्यांची साथ आपल्याला शेवट पर्यंत मिळते. भौगोलिक दृष्ट्या ' नारायणगडाकडे ' पहिले तर हा किल्ला उंचीने अगदी छोटा आहे परंतु किल्याला चारही बाजूने नैसर्गिक कातळकडा आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळे जास्त तटबंदी किल्याला दिसत नाही. आपल्याला बुरुजांचे
अवशेष आणि तटबंदीच्या खुणा देखील पाहायला मिळतात. किल्यावर पूर्वी ' नारायणाची ' मूर्ती होती असे काही उल्लेख देखील मिळतात. संपूर्ण किल्ला पहात पाहत एकदाचे किल्याच्या माथ्यावर प्रवेश केल्यावर समोरची दृश्य बघण्यासारखी होती. उत्तरेच्या बाजूस दुरवर दिसणारा अष्टविनायकांपैकी एक महत्वाचे स्थान असणाऱ्या 'ओझरचा तलाव ' आणि त्यावर असलेली धुक्याची झालर विलोभनीय दिसते. तसेच किल्याच्या माथ्यावरून 'शिवनेरी ' धुक्यातून हळूच मान वर काढून ' जुन्नर ' या प्राचीन आर्थिक राजधानी वर लक्ष देत होता. तसेच दक्षिणेस खोडदगावाचे आणि GMRT च्या दुर्बिण दिसतात.या गडमाथ्याच्या येथून दोन पायवाटा फुटतात एक पायवाट डाव्या बाजूला वर चढत जाते आणि दुसरी पायवाट उजव्या हाताला जरा झाडीत वळते.' नारायणगडाच्या ' माथ्यावर सगळीकडे खुरटे गवत मोठ्या प्रमाणात आढळते. परंतु लोकांच्या येण्याजाण्यामुळे याठिकाणी पाउलवाटा पडलेल्या आहेत. आपण या मुख्य वाटेवरून चालत गेले असता आपल्याला एक पाण्याचे कोरडे टाके
दिसते. आज हे टाके जवळपास बुजलेल्या अवस्थेत होते परंतु काही दिवसांपूर्वी काही निसर्ग प्रेमीनी त्या साफ केल्या आहे येथून अगदी पाच ते दहा पावले चालल्यावर आपण एका उंचवट्यावर उभे राहतो तेथून किल्यावर नजर टाकली तर किल्याचा संपूर्ण परिसर न्याहाळता येतो. येथून पुढे चालत गेल्यावर गडाच्या सर्वोच्च शिखरावर म्हणजे 'हस्ताबाई ' या देवीच्या मंदिरात जाऊन पोहोचलोमंदिरातील ' हस्ताबाई ' या देवतेची मूर्ती अत्यंत देखणी आहे. नागपंचमी ला व दसऱ्याला हस्ताबाईची मोठी जत्रा गडावर भरते. हि मूर्ती शस्त्र सज्ज असल्याची आपल्याला पाहायला मिळते. या मंदिराच्या समोर एक जुनी दगडी दीपमाळ देखील बघण्यासारखी आहे. या गडदेवतेचे दर्शन घेऊन या मंदिराच्या मागे जाऊन उभे राहिले कि जो काही ' जुन्नर आणि सह्याद्रीचा ' नजारा बघायला मिळतो तो कितीही डोळ्यात साठवायचा प्रयत्न केला तरी तो कमीच असतो. परत तेथून त्या कोरड्या पाण्याच्या टाक्या पर्यंत आल्यास आणि डाव्या हाताच्या झाडीत
शिरलो तेथे काही चौथऱ्यासारखे अवशेष पाहायला मिळतात. तसेच येथून थोडे पुढे चालत गेले असता पूर्वीच्या काळात खोदलेले एक सुंदर टाके बघायला मिळते. या किल्यावर अनेक छोटे मोठे चढ उतार बघायला मिळतात आणि त्याच्यावर वाढलेल्या गवतामुळे किल्याचे बरेचसे अवशेष हे गवतामधून शोधावे लागतात. येथून पुढे चालत गेले असता एक सुंदर टाके बघायला मिळाले जमिनीशी समतल असलेले हे पाण्याचे
टाके ' नारायण टाके ' म्हणून सगळीकडे ओळखले जाते. तसेच या टाक्याच्या मागच्या बाजूस एक मोडी शिलालेख देखील बघायला मिळतो. हे टाके त्या काळात
अत्यंत सुंदर रीतीने खोदलेले आहे. हे टाके पाहून झाल्यावर गडाच्या पूर्व दिशेला सलग पाच पाण्याच्या टाक्यांचा समूह पाहायला मिळतो अत्यंत सुंदर जोड टाक्यांचा हा समूह 'चावंड ' किल्यावरच्या टाक्यांच्या समूहाची आठवण करून देतो. परंतु दुर्दैवाने आजहि सगळी टाकी ओहोरलेली असून ती बुजत चालली आहेत.गडाच्या इतिहासावर जर नजर
टाकली तर जुन्नर परगण्यामध्ये नारायणगड आणि खोडद यांचा समवेश होतो. नारायणगडाचा किल्ला म्हणून वापर बाळाजी विश्वनाथाच्या कालावधीत सुरु झाला. किल्याची तटबंदी बाळाजी विश्वनाथाच्या कालखंडात बांधली गेली. गडाचे बाकीचे काम नानासाहेब पेशवे यांच्या कारकिर्दीत पूर्ण झाले. याची नोंद नानासाहेब पेशव्यांच्या रोजनिशीमध्ये आहे. पहिल्या बाजीराव पेशव्यांचा नारायणगडाशी जवळचा संबंध होता. बाळाजी विश्वनाथाच्या मृत्यूनंतर छत्रपती शाहूंनी पेशवे पदाची सूत्रे बाजीरावा कडे सोपवली तेव्हा नारायणगाव आणि नारायणगडाचा सरंजाम त्याला दिल्याचे पत्रांमध्ये
उल्लेख सापडतात. इ.स.१६०५ पासून जुन्नर परगण्याचा ताबा मालोजीराजांकडे होता. शाहजी महाराजांनी अनेकदा आपली नोकरी बदलली मात्र जुन्नर – नारायणगाव ते चाकाण पर्यंत च्या परिसराचा ताबा सोडला नाही. जुन्नर परगण्या मध्ये नारायणगड आणि खोडद गावाचा समावेश होतो. नारायणगडाचा किल्ला म्हणून वापर बाळाजी विश्वनाथांच्या कालवधीत सुरु झाला.किल्ल्याची तटबंदी बाळाजी विश्वनाथांच्या कालवधीत झाली.हे काम नानासाहेब पेशव्यांच्या कारकिर्दीत पुर्ण झाली त्या विषयीची नोंद नानासाहेब पेशव्यांच्या रोजनिशी मध्ये आली आहे. नानासाहेब उर्फ बाळाजी बाजीरावपेशव्याच्या कालावधीत पेशवाईची आर्थिक कारभार सदाशिवभाऊकडे होता सदाशिवभाऊ आर्थिक व्यवहारामध्ये दक्ष होता. इ.स.१७५८ मधील नारायणगडाचा आर्थिक हिशेब आपणाकडे तातडीने सादर करावा हा त्यांचा सक्तीचा आदेश चिटणीसी दप्तरामध्ये आहे. १९४२ मध्ये महात्मा गांधीच्या "भारत छोडो " या आंदोलनाला या गावातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता.माजी पोलीस पाटील कै.रावजी पाटील काळे, श्री बाळा पाटील गायकवाड यांच्या समवेत ग्रामस्थांनी नारायणगडा वर राष्ट्रध्वज फडकविला होता. हि माहिती कळल्यावर इंग्रज पोलीस त्या गावकऱ्यांच्या शोधात खोडद गावामध्ये आले होते. पण गावकर्यानि त्या बाबत कहिहि माहिती दिली नाही.
असा आहे आपला नारायणगड मग कधी येताय नारायणगड च्या भेटीस
धन्यवाद
प्रविण खरमाळे (खोडद)